लातूर | प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या आयुष्यात आलेल्या संकटाच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संपूर्ण राज्यात संवेदनशील प्रशासनाचा आदर्श पाहायला मिळाला. वीज पडून बैल दगावल्याने शेतीची कामे थांबण्याची वेळ आलेल्या गायकवाड कुटुंबाला अवघ्या काही तासांत नवीन बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली.
शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात काशिनाथ गायकवाड यांच्या बैलावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. शेतीच्या हंगामाच्या तोंडावरच आधाराचा बैल गमावल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी पत्नी हौसाबाई यांनाच जोखडाला जुंपून नांगरणी करण्याची वेळ या कुटुंबावर आली.
ही हृदयद्रावक बाब माध्यमांमधून समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत लातूर जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक ती मदत त्वरित पोहोचविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महसूल, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या.
पशुसंवर्धन विभागाने अल्पावधीतच गायकवाड कुटुंबासाठी एक बैल उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा बैल थेट काशिनाथ गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आला. याचबरोबर वीज पडून मृत्यू झालेल्या बैलासाठी शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कमही मंजूर करून देण्यात आली.
या तातडीच्या मदतीमुळे शेतीची रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गायकवाड कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे शासन संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेशही या घटनेतून अधोरेखित झाला आहे.
काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. संकटाच्या काळात मिळालेल्या या तातडीच्या मदतीमुळे पुन्हा नव्या उमेदीने शेतीची वाटचाल सुरू करण्याचा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी किती गंभीर असतात, याचे हे उदाहरण असून अशा वेळी शासनाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
