प्रतिनिधी परमेश्वर कांबळे
**पिंपरी-चिंचवड:**पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील खराब रस्ते, जुन्या ड्रेनेज लाईन्स आणि नागरी समस्यांवरून स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते **जमीर आदम तांबोळी** यांनी या संदर्भात थेट महानगरपालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांसह विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत आंदोलनाचा थेट इशारा दिला आहे. येत्या ३० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास स्थानिक नागरिकांसह महापालिकेवर ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
### ‘प्रभाग ९’ सोबत मनपाचा दुजाभाव का?
जमीर तांबोळी यांनी निवेदनात प्रशासकीय कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमधील इतर भागांत नागरिकांनी तक्रार केल्यावर दुसऱ्याच दिवशी कामे सुरू होतात, याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, प्रभाग ९ मधील कर्मयोग हाऊसिंग सोसायटी, आनंदी बाग, बजरंग नगर, संभाजीनगर या भागात १५ वर्षांपूर्वीच्या जुन्या ड्रेनेज पाईपलाईन बदलण्याची मागणी केली असता, “निधी नाही, नियोजन करावे लागेल” अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांकडून दिली जात आहेत. हा थेट दुजाभाव असल्याचा आरोप तांबोळी यांनी केला आहे.
### पावसाळ्यात परिसराला नदीचे स्वरूप
पावसाळ्यात महिंद्रा अँथियासमोरील रोडवरून येणारे सर्व पाणी बजरंग नगर आणि खराळवाडी मशीद परिसरामध्ये शिरते. यामुळे संपूर्ण भागाला नदीचे स्वरूप येते आणि नागरिक त्रस्त होतात. लोकसंख्येचा विचार करता या ठिकाणी **१५०० एमएम** क्षमतेची नवीन पाईपलाईन आणि मोठ्या गटार नाल्यांमध्ये **३००० एमएम** चे पाईप बसवणे अत्यंत गरजेचे आहे, अशी तांत्रिक मागणीही त्यांनी केली आहे.

### मुख्य मागण्या आणि निवेदनातील मुद्दे:
* **रस्ते डांबरीकरण व फूटपाथ दुरुस्ती:** खराळवाडी आणि कामगार नगर भागात मागील ९ वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण आणि फूटपाथची दुरुस्ती झालेली नाही. या ९ वर्षांत किती वेळा डांबरीकरण झाले, याची माहिती प्रशासनाने द्यावी आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा स्वतः अधिकाऱ्यांनी येऊन पहावी.
* **अनावश्यक शौचालये पाडण्याची मागणी:** बजरंग नगर, शेडगे वखार, भागवत गीता मंदिर आणि पाटील हॉस्पिटल शेजारील अनावश्यक सार्वजनिक शौचालये पाडून महापालिकेची लाखो रुपयांची उधळपट्टी थांबवावी. तसेच, सोनारुपा येथील शौचालयाची त्वरित दुरुस्ती करावी.
* **आरोग्य विभागाची निष्काळजी:** आरोग्य विभाग या भागातील गटार आणि नाले व्यवस्थित साफ करत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
* **कामचुकार अधिकाऱ्यांची बदली करा:** ‘क’ प्रभाग कार्यालयातील अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने, आयुक्तांनी या ठिकाणी कार्यक्षम आणि नवीन दमाचे अधिकारी द्यावेत आणि सध्याच्या अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करावी.
> **”प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने न बघितल्यास ३० दिवसांनंतर स्थानिक जनतेचा जनक्षोभ कसा असतो, हे मनपा लायकीने बघेल. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत.”**
> — *जमीर आदम तांबोळी (सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्ते)*
न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
