जालना पोलिसांचा दणका! दोन तासांच्या विशेष मोहिमेत ३४३ वाहनांवर कारवाई; साडेतीन लाखांचा दंड वसूल*
जालना प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके

जालना : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. बुधवारी (१८ मार्च) सायंकाळी शहरात राबवलेल्या एका विशेष मोहिमेत अवघ्या दोन तासांत ३४३ वाहनांवर कारवाई करत ३ लाख ५५ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. बुधवारी दुपारी ४:०० ते सायंकाळी ६:०० या कालावधीत शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांची कसून तपासणी करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी एकूण ३४३ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून एकूण ३,५५,६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार यापुढेही अशा प्रकारची विशेष मोहीम शहरात सातत्याने राबवली जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



