घरकुल, विहीर, जलजीवन ते मनरेगा योजनांत लूट; संदीप पवार यांच्या निलंबनाची जोरदार मागणी*
*गरीबांच्या योजनांवर डल्ला टाकणाऱ्यांवर FIR दाखल करा; जालन्यात संतापाची लाट*
प्रतिनिधी –
जालना पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा गटविकास अधिकारी श्री. संदीप पवार यांच्या विरोधात विविध शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, आर्थिक अपहार आणि बोगस निधी वाटप केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद जालना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत घरकुल योजना, सिंचन विहिरी, गाय गोठा योजना, मनरेगा, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गरीब लाभार्थ्यांकडून उघडपणे पैसे उकळून शासनाच्या निधीची लूट करण्यात आल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
तक्रारीनुसार प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना आणि मोदी आवास योजना यामध्ये लाभार्थ्यांकडून हप्ते मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करण्यात आली. अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष नवीन घरकुल बांधलेच नसताना जुन्या घरांना रंगरंगोटी करून त्यांना नवीन घरकुल दाखवण्यात आले आणि बोगस जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शासनाचा निधी उचलण्यात आल्याचे आरोप आहेत. प्रत्येक लाभार्थ्याकडून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत सक्तीची वसुली करण्यात आल्याने गरीब कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. घरकुल योजनांच्या नावाखाली चाललेल्या या कथित भ्रष्टाचारामुळे शासनाच्या योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिंचन विहीर योजनांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन विहीर मंजूर करून देण्यासाठी तसेच पुढील हप्ते बँक खात्यावर जमा करण्यासाठी प्रत्येकी वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पैसे न देणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून मानसिक त्रास दिल्याचेही आरोप आहेत. ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ अंतर्गत गाय गोठा मंजुरीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची वसुली करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या नावावर चाललेली ही आर्थिक पिळवणूक थांबवून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
मनरेगा योजनांमध्ये बोगस मजूर हजेरी पट तयार करून शासनाचा निधी हडप करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे. प्रत्यक्ष मजुरांकडून काम न करून यंत्रांच्या साहाय्याने कामे करून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच १४ वा आणि १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून वॉटर फिल्टर, एलईडी दिवे, कचरा कुंड्या यांसारख्या साहित्यांची चढ्या दराने खरेदी करून मोठ्या प्रमाणावर कमिशनबाजी झाल्याचा आरोप आहे. पंचायत समिती स्तरावर योजनांच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित भ्रष्टाचारामुळे शासनाच्या निधीचा अक्षरशः बाजार मांडल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. या सर्व व्यवहारांची आर्थिक चौकशी विभागामार्फत तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदारांची बिले मंजूर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये नळजोडणी पूर्ण नसतानाही केवळ टक्केवारीसाठी कामे पूर्ण दाखवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या कामांमध्ये बोगस लाभार्थी दाखवून निधी उचलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांमध्येच भ्रष्टाचाराचे जाळे उभे राहिल्यामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गरीबांच्या नावावर निधी मंजूर करून तो काळ्या बाजारात वळवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आता तीव्र होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, सर्व कामांचे प्रत्यक्ष फिल्ड व्हेरिफिकेशन करण्यात यावे आणि चौकशीदरम्यान कोणताही दबाव येऊ नये म्हणून श्री. संदीप पवार यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाचा निधी लाटणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचीही मागणी पुढे आली आहे. जर पंधरा दिवसांच्या आत निष्पक्ष चौकशी सुरू झाली नाही तर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन आणि उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विकास पालवे गणेश मोरे संजय भालेराव स्वरूप सानप बाळू घुगे संतोष गाढवे फरहान अन्सारी अरुण सदावर्ते रमेश सदावर्ते मीरा खाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज एक्सप्रेस १८,
*Facebook | Twitter | Pinterest | LinkedIn**
