प्रतिनिधी :- प्रमेश्वर कांबळे
महाबळेश्वर :- आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या घाटात एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गातील आंबेनळी घाटाच्या परिसरात ही दुर्घटना घडली.
स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरु झाले. बचाव पथकांना आतापर्यंत दोन मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटात जवळपास 1000 फूट खोल दरीत कोसळली आहे. ही स्कॉर्पिओ गाडी साताऱ्यातील असल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईंकाच्या मते, शुक्रवारी रात्री ही मुलं रत्नागिरीला हर्णे बीचवर आली होती. शनिवारी त्यांनी हर्णे बीचवर मुक्काम केला. त्यानंतर रविवारी पहाटे अडीच वाजता हर्णे बीचवरून जात होते. सर्वजण थकले होते. कुणीही विश्रांती घेतलेली नव्हती. त्यामुळे चालकाही झोप झाली नसावी. विश्रांती नसल्याने चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यांची कार दरीत गेली असावी.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री १० वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. सध्या दोरीला स्ट्रेचर बांधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात गेली आहे. अपघातामधील मृत प्रवासी हे कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.
प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
