Site Logo
महाराष्ट्रसामाजिक

बाबासाहेबांसाठी सरकारी नोकरी पणाला, मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?…

प्रतिनिधी :- संतोष माने

नाशिक :- देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अशातच नाशिकमध्ये मात्र खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले.

पंरतु, आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यावरून वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले. विरोधकांनी या घटनेनंतर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. बाबासाहेब आंबेडकरांसाठी प्रसंगी नोकरी पणाला लावणाऱ्या, बाबासाहेबांचे नाव पुसू देणार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या माधवी जाधव कोण आहेत?

गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही.

कुंभमेळ्यात नदीत आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. संविधानाच्या मार्गानेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल, तेव्हाच ते पाप धुतले जाईल. गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी दाखल करावी. अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणार आहे, असा थेट इशारा माधवी जाधव यांनी दिला आहे.

माधवी जाधव यांचा आक्रमक पवित्रा अन् कार्यक्रमस्थळी मोठा तणावपालकमंत्र्यांचे भाषण ऐकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात नसल्याचे पाहून जाधव संतापल्या. भाषण सुरू असताना माधवी जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत पालकमंत्र्यांना टोकले. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले असता, त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मला कामावरून काढून टाकले तरी चालेल किंवा सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक मान्य केलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी माधवी जाधव यांनी केली.

बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही…

पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचे काम दिले तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव भाषणात आले नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नाव वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्यांचे नाव भाषणात का नाही? अशी विचारणा माधवी जाधव यांनी केली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

थेट मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, माधवी जाधव या शासकीय नोकरी करत आहेत. त्या वन विभागात वनरक्षक या पदावर आहेत. माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे यादेखील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अनावधानाने राहिले असेल. माझा तसा काही हेतू नव्हता. माझ्या मागील भाषण बघा कधीही असे झालेले नाही. यावेळी अनावधानाने झाले असेल. याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button